Description
गदिमांच्या या आत्मपर लेखांचे स्वरूप स्मरणरंजनात्मक;
परंतु ललितरम्य आहे. पूर्वायुष्यातल्या आठवणी जागवताना
‘त्या सगळ्याच घटनांत एक आगळी मौज होती’,
असे गदिमांनी म्हटले आहे. ते सारे दिवस मंतरलेले होते.
अवघड असले तरी उभारीचे होते. संस्कारांचे होते,
जडणघडणीचे होते, उत्साह आणि उमेद वाढवणारे होते,
असा भाव या संग्रहातल्या लेखांतून व्यक्त होतो.
निवेदनातला ऐसपैसपणा आणि खुलेपणा त्यांच्या
उमद्या स्वभावावर प्रकाश टाकतो.
ग. दि. माडगूळकरांचे हे लेखन विलोभनीय असून
त्यातला ताजेपणा, भाषेचा मराठमोळा सुगंध मनाला मोहवतो.
त्यांच्या भाषेतला ओढा, चित्रमयता आणि नादमधुरता
वाचकाला गुंगवून टाकते. व्यक्ती, प्रसंग, घटना जिवंत करणारी
सर्जक प्रतिभा मनाला भावते.
गतकाळातील स्वत:च्या मन:स्थितीचे अचूक वर्णन करताना
त्यांची लेखणी विलक्षण संयम धारण करून व्याकूळ भावस्पंदने उमटवते.
चराचरातील अमूर्त किंवा जडभौतिक तत्त्वांनाही माडगूळकरांच्या
लेखणीतल्या विजेचा स्पर्श लाभला की,
ती तत्त्वे सजीव-समूर्त होऊन वाचकांसमोर अवतरतात.
– अविनाश सप्रे
————————————————————————————————————————-
गीतारामायणकार, मराठीचे वाल्मीकी, पद्मश्री, कथा, चित्रकथा, नाटक, कांदबरी, आत्मचरित्रलेखक म्हणून गदिमा आपणास परिचित आहेत. मात्र जनमानसात त्यांची ओळख झाली ती गीतलेखनामुळे. अध्यात्माचा उत्कट स्पर्श असलेली गीते, भक्तिगीते, सवाल-जवाबांची ठसकेदार रचना, निर्भर शृंगाराच्या लावणीरचना, निर्व्याज भावनांनी नटलेली बालगीते, गंगाकाठी, कन्याकुमारीसारखी कथाकाव्ये आणि गीतरामायणासारखी प्रासादिक, भावसंपन्न, मराठी मनांना सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ हे विरुद्ध महाराष्ट्रातील जनतेने त्यांना मोठ्या आदराने बहाल केले. गदिमा नावाची एक प्रतिभेचे देणे घेऊन आलेली माती त्या संस्कारात लेखक, देशभक्त, कवी, कथाकार, नट असे सुरेख आकार आणि नक्षी घेत घडली. आत्मचरित्र, व्यक्तिचित्र, ललितलेख, लघुकथा, दीर्घकथा, प्रवासवर्णन, चित्रपटकथा, काव्य आदी साहित्यकृती वाचकांच्या मनाची ठाव घेणारी आहे, हे निश्चित!
Reviews
There are no reviews yet.