Description
प्रस्तुत ‘हिंदूत्व’ पुस्तक चार भागांत आहे. यात प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या ओजस्वी शैलीत व परखडपणे हिंदुत्वाविषयी आपले विचार मांडलेले दिसतात. हिंदू धर्माची झालेली अवस्था आणि त्याची कारणमीमांसा केलेली दिसते. वेदपूर्वकाळापासून मुसलमानांच्या आक्रमणानंतर भारतभूमीच्या झालेल्या अवस्थेचे चिकित्सात्मक पद्धतीने वर्णन करून हिंदू धर्माच्या र्हासाची व अध:पाताची कारणे स्पष्टपणे मांडलेली दिसतात. त्याचबरोबर प्रबोधनकार आपल्या लिखाणातून भिक्षुकशाहीवरही जोरदार प्रहार करतात. भिक्षुकशाही सामान्य जनतेला कसं जेरीस आणते आणि स्वत:चा स्वार्थ कसा साधते, देवांच्या देवळांची निर्मिती करून त्यांना व्यावसायिक रूप कसे आणते, यांविषयी ते परखडपणे आपले विचार मांडतात. यासाठी या देशातील तरुणांनी स्वयंप्रेरणेने या बंडाच्या विरुद्ध उभे राहून त्यांच्या विचारांचा हातोडा अशा पद्धतीने चालवावा की, तो थेट देवावर आणि देवाच्या देवळावर पडेल असा आशावाद प्रबोधनकार या लेखातून बोलून दाखवितात.
प्रबोधनकार केशव ठाकरे हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, मराठी साहित्यिक आणि सामाजिक विचारांचे अग्रणी होते. त्यांना ‘प्रबोधनकार’ या नावाने ओळखले जाते, कारण त्यांनी समाज प्रबोधनासाठी ‘प्रबोधन’ मासिकाचे संपादन केले. प्रबोधनकार ठाकरे हेे समाजाच्या समस्यांकडे तटस्थपणे पाहत असत. त्यांनी आपल्या लेखणीतून समाजमान्यता असलेल्या अन्यायाला वाचा फोडली. जातीय शोषण, प्रथा-परंपरा, भोंदूगिरी यांविरुद्ध लिखाणाद्वारे आवाज उठविला. तसेच त्यांनी विविध विचारप्रधान लेख, कादंबर्या आणि नाटके लिहिली. त्यांच्या विचारांनी समाजवादी आणि विचारप्रवर्तक आंदोलनाला बळ दिले. समाज प्रबोधनाचे ते मूर्तिमंत उदाहरण होते आणि त्यांनी आपल्या लेखणीतून समाजाला नवी दिशा दिली.
अवचित नि अयाचित योगाने गाडगेबाबांचे हे परम पवित्र सगुण चरित्र लिहिण्याची कामगिरी मजवर सोपवण्याची श्री. बाबांची लहर लागली. बाबांचे चरित्र महासागरासारखे अफाट नि विशाल हकिकतीचे, आठवणींचे नि भक्तजनांकडून आलेल्या नानाविध गोष्टींचे कितीतरी कागदपत्र माझ्यासमोर उभे. किती घ्यावे नि कोणते टाकावे, समजे ना. गांगरून गेलो मी! प्रथम, तपशीलवार विस्तृत मोठे चरित्र लिहिण्याची योजना. ते काम सावकाशीने चालले असतानाच, एक दिवस निरोप आला.
“फुलवात तेवत आहे तोवर तिच्या उजेडात काय पाहायचे ते पाहून घ्यावे, केव्हा वारा येईल नि ती विझेल, याचा काय नेम ? ”
या निरोपाने मी तर चरकलोच. चला, मोठे नाही तर छोटे. पण माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे वाचकांच्या विचारांना चालना देणारे पुस्तक शक्य तितक्या झटपट लिहून बाहेर काढण्यासाठी बसलो टाइपरायटर खडाडवीत. बाबांच्या शतपैलू चरित्रातील मुख्यमुख्य ठळक पैलू मी येथवर चित्रित केले. इंद्रधनुष्याप्रमाणे चित्ताकर्षक असणाऱ्या शेकडो नवलकथांचा समावेश करण्याचा मोह शिकस्तीने टाळावा लागला. एक तर लेखन मर्यादा आकुंचलेली आणि बाबांच्या निरोपातली ती निरांजन मला सारखी वाकुल्या दाखवीत सुटली. केली सेवा वाचकानी गोड मानून घेतली का त्यातच मला आनंद.
अखेर, गंगेच्या पाण्याने पूजा, या न्यायाने ही चरित्र लेखनाची पत्री श्री. गाडगेबाबांच्या चरणा (अरे हो! पायाना तर ते हातही लावू देणार नाहीत.) बाबांच्या त्या कामधेनू गाडग्यांत साष्टांग प्रणिपाताने समर्पण करीत आहे. गरिबाची ही शिळीपाकी भाकरी आमटी बाबांनी रुचकर मानून दिलेला समाधानाचा देकर कानी पडला म्हणजे आयुष्याचे सार्थक मानणार-
मुंबई नं.२८ केशव सीताराम ठाकरे
महाशिवरात्र शके १८७३
ता. २३ फेब्रुवारी १९५२







Reviews
There are no reviews yet.