Brahmananche Kasab Aani Itar Sahitya | Shetkaryacha Asud | Gulamgiri | Sarvajanik Satyadharma | Jotirao Phule

Description

‘ब्राह्मणांचे कसब’ हे महात्मा जोतीराव फुले यांचे एक सुप्रसिद्ध पुस्तक आहे, ज्यामध्ये त्यांनी भारतीय समाजातील जातिव्यवस्थेचा आणि विशेषतः ब्राह्मणांच्या इतर जातींवरील प्रभावाचा तपशीलवार ऊहापोह केला आहे. हे पुस्तक काव्यरूपात असून, समाजातील दुर्बल आणि शोषित घटकांमध्ये जागृती करण्यासाठी लिहिले गेले आहे. या पुस्तकाद्वारे फुले यांनी समानता व सामाजिक सुधारणा यांचे महत्त्व स्पष्ट केले आहे. हे पुस्तक त्यांच्या व्यापक सामाजिक सुधारणा अजेंड्याचा एक भाग आहे.

प्रस्तुत पुस्तकात पुढील विषयांचा समावेश आहे :

जातीयतेवर आधारित शोषणावर भाष्य.
ब्राह्मणांच्या धर्मवर्चस्व व प्रथा यांचा उलगडा.
समाजातील अन्याय आणि विषमता यांवर उपहासात्मक टीका.
शिक्षण आणि ज्ञान यांचे महत्त्व
समता आणि बंधुता यांविषयीचे विचार
ब्राह्मण समाजाच्या मार्गदर्शनावर प्रश्नचिन्ह.
स्त्रीशिक्षणाचा आग्रह आणि महत्त्व

महात्मा फुले यांनी त्यांच्या प्रखर शब्दांनी समाजातील अशिक्षिततेला आणि अज्ञानाला उजागर केले आहे. हे पुस्तक त्यांच्या सामाजिक क्रांतिकारक विचारांचे अप्रतिम उदाहरण आहे.

“या ग्रंथाचा मुख्य उद्देश असा आहे कीं, आज शेंकडों वर्षे शूद्रादि अतिशूद्र, ब्राह्मण लोकांचें राज्य झाल्यापासून सतत दुःखें सोशीत आहेत व नानाप्रकारच्या यातनेंत आणि संकटांत दिवस काढीत आहेत, तर या गोष्टीकडे त्या सर्वांचे लक्ष लागून त्यांनीं तिजविषयीं नीट विचार करणें व येथून पुढें भटब्राह्मण लोकांचें अन्यायी जुलमापासून आपली सुटका कशी करून घेणें हाच काय तो आहे.
ते लोक परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे राहणारे लोकांस जिंकून त्या सर्वांस त्यांनी आपले दास केले व त्यांस अनेक तऱ्हेचीं क्रूर शासनें दिलीं. पुढे कांहीं काळानंतर त्या लोकांस या गोष्टीचें विस्मरण झालेसें पाहून भट लोकांनी परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे लोकांस जिंकून त्यांस दास केल्याचें मुळींच छपवून ठेविलें. त्या लोकांनी आपली वजनदारी ह्या लोकांचे मनावर बसवावी याजकरितां जेणेकरून आपले मात्र हित होईल असे नानाप्रकारचे उपाय योजले व ते सर्व सिद्धीस जात गेले.
इंग्रज लोकांनी तर पुष्कळ ठिकाणीं इतिहास वगैरे ग्रंथांत भट लोकांनी स्वहितास्तव इतर लोक, म्हणजे, शूद्रादि अतिशूद्र लोक ह्यांस आपले गुलाम करून टाकिलें आहे, असें संमत दिलेलेंच आहे.
या देशात इंग्रज सरकार आल्यामुळें शूद्रादि अतिशूद्र भटाच्या कायिक दास्यत्वापासून मुक्त झाले खरे, परंतु आम्हांस सांगण्यास मोठें दुःख वाटतें कीं, अद्यापि आमचे दयाळू सरकारचे शूद्रादि अतिशूद्रांस विद्या देण्याविषयीं दुर्लक्ष असल्यामुळें ते अज्ञानी राहून भट लोकांचे बनावट ग्रंथांच्या संबंधानें त्यांचे मानसिक दास झालेले आहेत व त्यांस सरकारजवळ दाद मागण्याचें त्राण राहिलें नाहीं. भट लोक त्या सर्वांस प्रापंचिक सरकारी कामांत किती लुटून खातात, याजकडेस आमचे सरकारचें मुळींच लक्ष पोंहचलें नाहीं, तर त्यांनीं दयाळू होऊन या गोष्टीकडेस नीट रीतीनें लक्ष पुरवावें व त्यांस भट लोकांचे मानसिक दास्यत्वापासून मुक्त करावें अशी आम्हीं आपले जगन्नियंत्याजवळ शेवटली प्रार्थना करितों.”
१ जून १८७३
जो. गो.

जोतीराव फुले यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ हे पुस्तक १८७३ मध्ये लिहिले. आज इतक्या वर्षांनंतर आणि इतर अनेक संपादने उपलब्ध असताना, त्या पुस्तकाचे आवर्जून नव्याने संपादन करण्याची गरज काय, असा प्रश्न कोणाला पडू शकेल; पण थोडा विचार केल्यास त्या प्रश्नाचे उत्तरही सापडू शकेल. ‘असूड’ लिहिला गेला त्या वेळी देशातील शेतकऱ्यांची जी स्थिती होती, त्यापेक्षा आजही ती मूलतः निराळी नाही. असलीच तर ती अधिकच बिघडली आहे, हे गेल्या काही वर्षांत दीड लाख शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांवरून सहज ध्यानात येऊ शकेल. या देशातील कोरडवाहू शेतकऱ्यांचे प्रश्न आवर्जून सोडवले गेल्याखेरीज देशाला भवितव्य नाही, हे जोतीरावांचे निदान आजही तितकेच यथार्थ आहे. तसेच ते प्रश्न सोडविण्याची दिशा काय असू शकते, याचा जोतीरावांनी केलेला ऊहापोह आजसुद्धा मार्गदर्शक ठरणार आहे. याचा अर्थ असा, की भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या चौसष्ट वर्षांपूर्वी जोतीरावांनी या पुस्तकात जे सांगितले होते ते आज स्वातंत्र्य मिळून चौसष्ट वर्षे उलटत आल्यानंतरही तेव्हाइतकेच महत्त्वाचे आहे, एवढे एक कारणही त्या पुस्तकाचे नव्याने संपादन करण्यासाठी पुरेसे आहे.
– भास्कर लक्ष्मण भोळ”

जोतीराव फुले यांनी धर्मप्रकरणी सत्यासत्य व कार्यकारणभाव यांचा शोध लावण्यास लोकांस सवय लावली, अमुक चाली बर्या किंवा वाईट यांचा न्याय त्यापुढे मांडला, मूर्तिपूजेचे खंडण केले, एकेश्वरी धर्माचे मंडन केले. धर्म, कर्म व व्यवहार यात लोक नाडले जाऊ नयेत म्हणून त्यांच्या समजुती पाडल्या. धर्मसंस्कार म्हणजे पूजाअर्चा, होमहवन व आहुती, मूर्तिपूजन, नैवेद्यार्पण, भूतपूजा वगैरे सर्व मतलबी साधूंच्या हिताचे असतात, तसेच धर्मभोळेपण व धर्मवेड हा सार्वजनिक सत्य धर्म ग्रंथ वाचल्याने जाईल, असेही फुले यांनी स्पष्ट केले.
एका ईश्वरास भजावे, सद्वर्तनाने वागावे, सर्वांनी बहीणभावंडाप्रमाणे वागावे, सर्व मनुष्याला सारखेच हक्क असावे. जातिभेद नसावा, स्त्रियांना व पुरुषांना सारखे हक्क असावे, अशी परिवर्तनवादी भूमिका जोतीराव फुले यांनी प्रस्तुत पुस्तकातून उद्धृत के ली आहे. एकंदर सर्व मानवस्त्रीपुरुषांच्या उपयोगी हा ग्रंथ पडावा म्हणून या ग्रंथास ‘सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक’ असे नाव दिले आहे, असे स्वत: महात्मा फुले उद्धृत करतात.
शूद्रादी अतिशूद्रास सत्याची जाण होऊन ते सुस्थितीत येतील, हा या ग्रंथकर्त्याचा निर्मळ उद्देश आहे. या पुस्तकाद्वारे शूद्रादी अतिशूद्रांस आपले जीवन सर्वांगीण दृष्टीने उज्ज्वल करण्यास उपयोगी पडेल, यात तीळमात्र संशय नाही. एवढे या पुस्तकाचे मोल आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Brahmananche Kasab Aani Itar Sahitya | Shetkaryacha Asud | Gulamgiri | Sarvajanik Satyadharma | Jotirao Phule”

Your email address will not be published. Required fields are marked *