Description
पडळ भरू लागली. शेवटी शेवटी आतून ओरडण्याचा, किंचाळण्याचा, रडण्याचा आवाज आला असे म्हणतात; पण तो काळच क्रूर होता.
भालदारांनी शेवटी शेवटी आत ढोसण्यासाठी हातातील भाल्यांचाही उपयोग केला असे म्हणतात.
खालचा मजला भरल्यावर त्यांनी माळा भरायला सुरुवात केली. अजूनही सारखा ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज येत होता. जानकीबाई तेथेच रडत, विनवणी करीत बसली होती. शेवटी ते पडवीतले ओरडणे न ऐकवून ती अडखळत अडखळत निघून गेली.
असे म्हणतात की, त्या एका रात्रीत ती कल्पनेबाहेर बदलली.
तिचे केस पिकले, हातपाय कापायला लागले, नजरेत एक प्रकारचा अस्थिरपणा आला. रात्रीची झोप पार उडाली.
तिने महाल सोडून जायचा फार प्रयत्न केला; पण मग तिला त्र्यंबकजीच्या स्वभावाची खरी कल्पना आली.
तिला महालात कैदी करण्यात आले होते. ज्या अनामिक सृष्टीला ती दूर लोटू पाहत होती, त्यात ती शेवटी गुरफटली गेलीच.
एका रात्री तिच्या खोलीतून मोठमोठ्या किंचाळ्या ऐकू आल्या.
गडीमाणसे आत गेली तेव्हा ती एका कोपऱ्यात अंग चोरून उभी होती व सारखे काहीतरी दूर लोटण्याचा प्रयत्न करीत होती.
डोळे भानावर नव्हते व तोंडाला फेस आला होता. ती सर्वांची ओळख विसरली होती.
वैद्य आले; पण त्यांचा काढा, प्राश, गुटिका कशाचाही उपयोग झाला नाही.
तोंडात काही घातले की ती लागलीच ‘थू:! थू:!’ करून बाहेर थुंकायची.
शेवटी काळालाच तिची दया आली व तिची या जगातून सुटका झाली.
————————————————————————————————————————–
काचेला डोळे टेकवून नलिनी बाहेरच्या अंधाऱ्या सृष्टीवर नजर खिळवून बसली होती.
काचेत अस्पष्टसे प्रतिबिंब दिसत होते; पण त्या प्रतिबिंबावर बाहेरची सरकणारी, अज्ञात ठिणग्यांनी फुललेली भयानक काळी रात्र आक्रमण करीत होती.
तिला वाटले, आपल्या आयुष्याचीही या क्षणी हीच गत झालेली आहे.
रोजचे सरावाचे जीवन एकदम धूसर, काचेवरच्या प्रतिबिंबासारखे भ्रामक झाले आहेपायाखालचा आसरा सरकायला लागला आहे- आणि या रहस्यमय रात्रीसारखेच काहीतरी अज्ञात, निष्ठुर, अगम्य काहीतरी आपल्या आयुष्यावर आक्रमण करीत आहे – आपले लहानसे जग अंधारात बुडून नामशेष होणार आहे.
या विचाराने असेल किंवा रात्रीच्या गारव्याने असेल, तिचे सर्व अंग एकदम शहारून उठले…
कोण होती ही नलिनी? कसल्या अनामिक संकटाने गांगरून गेली होती? स्वप्नात रममाण होण्याच्या काळात ती भीतीने का गोठून गेली होती? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि नारायण धारपांच्या रहस्यमय लेखनाचा थरार अनुभवण्यासाठी जरूर वाचावी अशी कादंबरी.
Reviews
There are no reviews yet.