Description
“ती जागी झाली होती. कशाने, तिला माहीत नव्हते.
पण मनाला कोणत्या तरी खोलवरच्या पातळीवर धोक्याचा इशारा मिळाला असला पाहिजे. कारण तिच्या सर्व चित्तवृत्ती अत्यंत तीक्ष्णतेने आसपासच्या परिस्थितीचा वेध घेत होत्या.
तीच ती चांदण्याने उजळलेली रात्र, तेच ते चंदेरी किरण… पण आता सर्वत्र एक निश्चलता होती-मोठी विलक्षण निश्चलता होती.
वारा अजिबात पडला होता.
झाडांचे एक पानही हलत नव्हते, ती सळसळत नव्हती- रातकिड्यांची किरकिर नव्हती-काहीही नव्हते.
विलक्षण शांतता.
हालचाल नाही. उघड्या खिडकीकडे पाहता पाहता तिला वाटले, हा खरा देखावा नाहीच, हे एक चित्र आहे-आपण खिडकीजवळ गेलो तर हाताला चित्रच लागेल. सर्व शरीर गारठून बधिर झाल्यासारखे वाटत होते.
तिने हात उचलला, तो गालावर, कपाळावर, मानेपाशी धरला-पण हात आणि गाल दोन्ही बर्फासारखे गार होते…. जणू उष्णता, ऊब या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या…. कधी कधी शरीराला ऊबच मिळाली नव्हती….आणि या गारठविणाऱ्या भीतीतून मनाला तो स्पर्श झाला…. उदासवाणी, घाणेरडी जागा सासूबाईंच्या जाऊबाई म्हणाल्या होत्या…. आणि आता तिच्या आसपास तो तीव्र, तिखट, दुष्टतेचा अर्क एखाद्या धुक्यासारखा पसरला होता…. तिला जाणवले की, खोलीत काहीतरी आले आहे…. काहीतरी दुष्ट, विकृत, पापी, सडके, कुजके, शापित, अस्पW… त्या अतीव दुष्टतेच्या गाभ्यात एक अघोरी चेतना होती. त्या विकृतीच्या गर्भातून एक आवाज पुटपुटत आला… “मी आलो आहे.”
————————————————————————————————————————
पडळ भरू लागली. शेवटी शेवटी आतून ओरडण्याचा, किंचाळण्याचा, रडण्याचा आवाज आला असे म्हणतात; पण तो काळच क्रूर होता.
भालदारांनी शेवटी शेवटी आत ढोसण्यासाठी हातातील भाल्यांचाही उपयोग केला असे म्हणतात. खालचा मजला भरल्यावर त्यांनी माळा भरायला सुरुवात केली.
अजूनही सारखा ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज येत होता.
जानकीबाई तेथेच रडत, विनवणी करीत बसली होती.
शेवटी ते पडवीतले ओरडणे न ऐकवून ती अडखळत अडखळत निघून गेली.
असे म्हणतात की, त्या एका रात्रीत ती कल्पनेबाहेर बदलली.
तिचे केस पिकले, हातपाय कापायला लागले, नजरेत एक प्रकारचा अस्थिरपणा आला. रात्रीची झोप पार उडाली.
तिने महाल सोडून जायचा फार प्रयत्न केला; पण मग तिला त्र्यंबकजीच्या स्वभावाची खरी कल्पना आली. तिला महालात कैदी करण्यात आले होते.
ज्या अनामिक सृष्टीला ती दूर लोटू पाहत होती, त्यात ती शेवटी गुरफटली गेलीच.
एका रात्री तिच्या खोलीतून मोठमोठ्या किंचाळ्या ऐकू आल्या. गडीमाणसे आत गेली तेव्हा ती एका कोपऱ्यात अंग चोरून उभी होती व सारखे काहीतरी दूर लोटण्याचा प्रयत्न करीत होती. डोळे भानावर नव्हते व तोंडाला फेस आला होता. ती सर्वांची ओळख विसरली होती. वैद्य आले; पण त्यांचा काढा, प्राश, गुटिका कशाचाही उपयोग झाला नाही.
तोंडात काही घातले की ती लागलीच ‘थू:! थू:!’ करून बाहेर थुंकायची.
शेवटी काळालाच तिची दया आली व तिची या जगातून सुटका झाली.
Reviews
There are no reviews yet.