Description
गदिमांच्या या आत्मपर लेखांचे स्वरूप स्मरणरंजनात्मक; परंतु ललितरम्य आहे. पूर्वायुष्यातल्या आठवणी जागवताना ‘त्या सगळ्याच घटनांत एक आगळी मौज होती’, असे गदिमांनी म्हटले आहे. ते सारे दिवस मंतरलेले होते. अवघड असले तरी उभारीचे होते. संस्कारांचे होते, जडणघडणीचे होते, उत्साह आणि उमेद वाढवणारे होते, असा भाव या संग्रहातल्या लेखांतून व्यक्त होतो. निवेदनातला ऐसपैसपणा आणि खुलेपणा त्यांच्या उमद्या स्वभावावर प्रकाश टाकतो.
ग. दि. माडगूळकरांचे हे लेखन विलोभनीय असून त्यातला ताजेपणा, भाषेचा मराठमोळा सुगंध मनाला मोहवतो. त्यांच्या भाषेतला ओढा, चित्रमयता आणि नादमधुरता वाचकाला गुंगवून टाकते. व्यक्ती, प्रसंग, घटना जिवंत करणारी सर्जक प्रतिभा मनाला भावते.
गतकाळातील स्वत:च्या मन:स्थितीचे अचूक वर्णन करताना त्यांची लेखणी विलक्षण संयम धारण करून व्याकूळ भावस्पंदने उमटवते. चराचरातील अमूर्त किंवा जडभौतिक तत्त्वांनाही माडगूळकरांच्या लेखणीतल्या विजेचा स्पर्श लाभला की, ती तत्त्वे सजीव-समूर्त होऊन वाचकांसमोर अवतरतात.
– अविनाश सप्रे
————————————————————————————————————————
या आत्मचरित्रात निवेदनाच्या ओघामध्ये गदिमांनी स्वत:च्या मातु.श्री, मा. विनायक, आचार्य अत्रे, बाबूराव पेंढारकर, वि.स. खांडेकर, बाबूराव पेंटर, सुधीर फडके आदी कितीतरी व्यक्तिचित्रे नेमक्या शब्दांत आणि सहज शैलीने रेखाटली आहेत. त्या-त्या परिस्थितीतील स्वत:च्या मन:स्थितीचे अचूक वर्णन करताना तर त्यांची लेखणी विलक्षण संयम धारण करुन करुण-व्याकूळ भावस्पंदने उमटवते. चराचरातील अमूर्त किंवा जडभौतिक तत्त्वांनाही माडगूळकरांच्या लेखणीतल्या विजेचा स्पर्श लाभला की, ती तत्त्वे सजीव-समूर्त होऊन वाचकांसमोर उभी राहतात.
गदिमा हे मराठी साहित्य-संस्कृतीतले एक झपाटलेले झाड होते. ऋतुपरत्वे अनेक उन्हाळे, पावसाळे, वादळे या झाडाने पाहिली आणि साहिली. तरीही हे स्वाभिमानी व कष्टाळू झाड ताठ उभे होते. असीम दारिद्य्र व अपार कष्ट अशा खडतर वाटचालीतूनही त्यांनी मराठीला काही अभिजात व कलापूर्ण चित्रपट दिले. त्यांच्या या अपूर्व देण्याबद्दल मराठी माणूस कृतज्ञ आहे. मराठी मनावर स्वत:ची एवढी दृढ-सखोल छाप ठेवणारा कलावंत विरळाच म्हणावा लागेल. आपल्या रुपाने गदिमांनी साहित्य-चित्रसृष्टीत एक वैभवशाली पर्वच निर्माण केले.
Reviews
There are no reviews yet.